Home » Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक » कृतिशील परराष्ट्र धोरण!

कृतिशील परराष्ट्र धोरण!

•चौफेर : •अमर पुराणिक•

सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

pm modi meets g20 leaders in australiaदेशाची आर्थिक, सामरिक आणि वाणिज्यिक क्षमता ही परराष्ट्र धोरणावर अवलंबून असते. देशाच्या संरक्षणात आणि विकासात याचा सिंहाचा वाटा असतो.  भारत स्वतंत्र झाल्यापासून परराष्ट्र धोरणाची प्रत्यक्षात कृती नगण्य होती. भारत देश आणि भारतीय नागरिकहा कायम इतर देशांसमोर मांडलिकासारखा वागत होता. स्वत्व आणि आत्मप्रतिष्ठा हरवलेला भारत देश म्हणजे इतर देशांच्या दृष्टीने लक्ष न देण्यासारखा देश वाटत होता. इतर देशांना भारताची कळ काढणे, अपमान करणे किंवा सोयीपूरते वापरणे इतकीच उपयोगिता वाटायची. पण आता मात्र काळ बदलला आहे. नरेंद्र मोदी संचलित भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून इतर देशांना भारताविषयी भूमिका बदलणे भाग पडत आहे. याला अमेरिका, चिनचाही अपवाद नाही. मोदी आपल्या दमदार परराष्ट्र धोरणांनी देशाच्या गंगाजळीत मोठी भर घालत आहेत तर दुसरीकडे सामरिक नितीही उत्तमपणे खेळत आहे.
नरेंद्र मोदी यांनी भारताचा आत्मसन्मान जागृत केला आहे. त्या अनुषंगाने भारतवासीयांचाही हळूहळु आत्मसन्मान जागृत होतोय ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आडगळीत पडलेले भारताचे परराष्ट्रधोरण मोदी सत्तेत आल्यानंतर पुन्हा आत्मतेजाने तळपू लागलेय. सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. मग ते शेजारी राष्ट्रांशी संबध असुद्यात, इतर देशांशी असलेले व्यापारिक संबंध असूद्यात किंवा बलशाली राष्ट्राशी संबंध आणि विकसनशील राष्ट्राशी नाते असूद्यात. मोदींनी अतिशय धोरणीपणे ही आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. आणि प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे देशाला मोठा आत्मसन्मान मिळवून दिला आहे. हे करताना देशवासियांची छाती अभिमानाने फूगली आहेच. पण जगभर पसरलेल्या अनिवासी भारतीयांची पुन्हा या देशाशी नाळ जुळली गेली आहे. ते मोदींना परदेशात उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.
मोदी यांनी १५-१६ जून रोजी पहिला परदेश दौरा केला तो भूतानचा. त्यानंतर १३ जुलै रोजी ६व्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी ब्राझील दौरा केला. ०२ ऑगस्ट रोजी नेपाळचा दौरा केला, तर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेेंबर दरम्यान जपानचा दौरा केला. २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमेरिकेचा दौरा केला. ११ ते १३ नोव्हेबर दरम्यान म्यानमारचा दौरा, १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि १९ नोव्हेंबर रोजी फिजीचा दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी परतलेे. या प्रत्येक दौर्‍यात मोदींनी देशाची मान जगभर उंचावली आहे. प्रत्येक देशात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांना भेटायला, पहायला अनिवासी भारतीय अक्षरश: वेडे झाले होते. प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी भारताचा झेंडा रोवला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानवर तर मोदींनी अक्षरश: भारताची मोहिनी घातली.
भारताशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबध असलेल्या भूतानचा पहिला दौरा मोदींनी शपथ ग्रहणानंतर केला. या दौर्‍यात द्विपक्षीय संबंधांच्या सर्व क्षेत्रात चर्चा व करार झाले. विशेषत: देशाची प्राथमिक गरज असलेल्या उर्जा क्षेत्रात महत्वाचे करार केले. भूतान भारताला स्वस्त विज पुरवतो, त्यामुळे जलविद्यूत क्षेत्रात महत्वाचे विषय हताळले गेले. सध्या भूतान तीन जलविद्यूत प्रकल्पांच्या माध्यमातून १४१६ मेगावॅट विज भारताला पुरवतो आहे. आता आणखी तीन जलविद्यूत प्रकल्प सुरु केले जाणार आहेत आणि ते २०१७-१८ पर्यंत सुरु होतील. भारत-भूतान यांच्यात मुक्त व्यापार संबध आहेत. देशाचा द्विपक्षीय व्यापार आता ६८३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारताने भूतानमध्ये जलविद्यूत, सिमेंट, सूचना प्रसारण आणि औद्यागिक क्षेत्रात एकूण १६ योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींनी या दौर्‍यात ६०० मेगावॅटच्या खोलोंगचू  जलविद्यूत प्रकल्पाची पायाभरणी देखील केली. तसेच पूर्व भूतानच्या त्रेशियन्ग्तसे येथिल आणखी एक प्रकल्प येत्या काही दिवसांत सुरु होईल. मोदींनी येत्या काही वर्षांत भूतानमधुन १० हजार मेगावॅट विजनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. दूसरे म्हणजे भारताला भूतानशी मैत्री ही सामरिक दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. कारण त्यामुळे चीनवर नियंत्रण ठेवणे भारताला सोपे जाते याचाही विचार या भूतानदौर्‍याबाबत केला गेलेला आहे.
जुलै महिन्यात ब्राझिलमध्ये ‘इठखउड’ राष्ट्रांची (इीरूळश्र, र्ठीीीळर, खपवळर, उहळरपर, र्डेीींह Aअषीळलर) परिषद झाली. या बैठकीत ब्रिक्सची नवी विकास बँक स्थापन करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला. याचा फायदा भारताला होणार आहे. ब्रिक्सच्या बैठकीत याशिवाय जलवायू परिवर्तन, जैविक उत्पादने, ओसाड क्षेत्रात वृक्षारोपण, जलसंवर्धन, भूआर्दता नियमन, कृषी-इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, जैव इंधन, औषधी वनस्पती उत्पादन, वायू गुणवत्ता प्रबंधन आदी क्षेत्रात परस्पर सहकार्याचे करार केले.
३-४ ऑगस्ट रोजी झालेल्या नेपाळ दौर्‍यात मोदींनी द्विपक्षीय सहकार्य सुदृढ़ करण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक, उर्जा-जल विद्युत, कृषि आणि कृषि उत्पादन प्रक्रिया, पर्यावरण, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रावर भर दिला. अपर करनाली जल विद्युत प्रकल्प विकास करारावर सह्या झाल्या. पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने नेपाळ-भारतादरम्यान मोठ्‌याप्रमाणात नवे रस्ते बांधणीचे करार झाले आहेत.
त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपानचा दौरा केला. जपान दौर्‍यात तर इतके करार झाले आहेत की तो वेगळ्या लेखमालिकेचा विषय होऊ शकतो. पंतप्रधानांना पहिला दौरा जपानचाच करायचा होता. जपानसारख्या तांत्रिकदृष्या अतिशय प्रगत देशाबरोबर भारताचे संबध मजबूत करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे मोदींसोबत अनेक व्यवसायिक, उत्पादक, त्यांचे सी.ई.ओ आणि त्यांचे शिष्टमंडळ गेले होते. या दौर्‍यात जपानने ३.५ ट्रिलियन येन म्हणजे ३५ बिलियन डॉलर्स अर्थात २,१०,००० कोटी रुपयांची सार्वजनिक आणि व्यवसायिक गुंतवणूक येत्या ५ वर्षात करण्याची घोषणा केली आहे. यात सागरी सुरक्षा, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शैक्षणिक क्षेत्रांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रासाठी यात कॅनाल टॉप ग्रिड कनेक्टेड सोलर फोटोवोलॅटीक (पी वी) पावर प्लांट सुरु करण्याची घोषणा केली आहे या प्रकल्पासाठी  जपान आंतरराष्ट्रीय सहयोग संस्था (जेआयसीए) द्वारे प्रकल्प अध्ययन तात्काळ सुरु केले आहे. स्मार्ट सिटी, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स, रस्ते विकास, विद्यूत आणि जलनियोजन, परिवहन, रस्ते, पर्यटन, अपरंपरिक उर्जा निर्मिती, स्टील, सीमेंट आणि यांत्रिक उपकरण, दूर संचार टॉवर ऊर्जा प्रबंधन प्रणाली, सिंचन, कृषी उपकरण, रेल्वे, हायस्पिड रेल्वे, सेमी हायस्पिड रेल्वे, मेट्रो, एयरक्राफ्ट, अंंतरिक्ष विज्ञान, आरोग्य चिकित्सा उपकरण, कर्करोग निदान व उपचार यंत्रणा आदी क्षेत्रात जपान गुंतवणूक करतोय. भारत आणि जपान यांच्यात वीजा प्रक्रिया सुलभ केले जाणार आहे.ज्यामुळे पर्यटन आणि व्यवसायाला वाव मिळणार आहे.
२६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मोदींनी अमेरिकेचा दौरा केला. ‘वसुधैव कुटुंबमकम’ची हाक देत अख्खा अमेरिका मोदींनी खिशात घातला. तेथिल अनिवासी भारतीयांच्या मनात प्रचंड आशावाद आणि देशप्रेम जागृत केले. अमेरिकेसोबतही अनेक करार मदार झाले. विशेषत: शिक्षण, मानवसंसाधन, कौशल्य, संशोधन आणि औद्यागिक क्षेत्रात भागिदारीसाठी मोदींनी अमेरिकन सरकारला हाक दिली. आणि अमेरिका मागचे भारताबरोबरचे ताणतणावाचे संबंंध विसरुन भारताचा साथ देण्यास सज्ज झाली. ही किमया मोदींनी लिलया साधली.
पंतप्रधान मोदींनी ११-१३ नोव्हेंबर या काळात ब्रह्मदेश/म्यानमारचा दौरा करत आणखी एका शेजारी राष्ट्राशी संवाद साधला. यात ६ द्विपक्षिय बैठका झाल्या यात मलेशियाचे पंतप्रधान, थायलंडचे पंतप्रधान, सिंगापूरचे पंतप्रधान, ब्रुनेईचे सुल्तान, कोरियाचे राष्ट्रपती आदींसोबत महत्त्वपुर्ण बैठका झाल्या. या शिवाय १२ व्या भारत आसियान शिखर बैठकीत सहभागी झाले जेथे सर्व आशियाई देशांचे नेते उपस्थित होते. भारत-आसियान शिखर बैठकीत मोदींनी आर्थिक, औद्योगिक, व्यापार कार्यक्रमाबरोबरच अशियाई देशांना एक नवा मंत्र दिला. ‘पूरब की ओर देखो नीति’ ‘पूरब में काम करो नीति’ हा मंत्र देऊन मोदींनी अशियाई देशांच्या संबंधांना नव्या युगात नेले आहे. याबरोबर चीनची समुद्री दादागिरी थांबवण्याच्यादृष्टीने पावले उचलली. दक्षिण चीनी सागरात शांती आणि स्थिरतेसाठी प्रत्येकाने नियम आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले.
१४-१८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारत-ऑस्ट्रलियांत आर्थिक भागिदारींचे महत्त्वपुर्ण करार झाले. येथेही कृषि, संसाधन, ऊर्जा, अर्थ,  शिक्षण, विज्ञान आणि औद्यागिक विकासाच्या वाटा खुल्या करणारे करार झाले. शिवाय लैंगिक समानतेच्या आणि महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने प्रयत्न करण्यावर चर्चा झाली. ऑस्ट्रलियातही अनिवासी भारतीय आणि ऑस्ट्रलियन नागरिकांना मोदींची भूरळ पडली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी ऍबॉट यांनी मोदींच्या राजकारणापासून बोध घेण्याचा सल्ला दिला आहे. भारत-ऑस्ट्रलिया संबंध विकसनाबरोबरच येथे पुर्व अशियाई शिखर बैठक, जी-२० शिखर बैठक झाली. आणि १९ नोव्हेंबरला मोदींनी फिजीचा दौरा करुन ते मायदेशी परतले आहेत.
गेल्या सहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रधोरण काय असते आणि विकासाचे राजकारण काय असते हे दाखवून दिले आहे. राष्ट्रसन्मानाची जाणिव देशवासियांना करुन दिली आहे. आज भारताची मान जगात परराष्ट्रधोरणांमुळे उंचावत आहे. विकासक, प्रशासक, शासक, सेनापती आणि सेवक अशा सर्वच नात्यांतून मोदींनी भारतवासियांना दिलेल्या ‘अच्छे दिन आनेवाले है’ या वचनाची पुर्तता करण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है’ ही केवळ निवडणूक जिंकण्याची घोषणा नव्हती तर भारत देश अच्छे दिन उपभोगणार असल्याची ही कृती आहे.

Posted by : | on : 24 Nov 2014
Filed under : Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *