शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक शेतकरी आणि उद्योजकाच्या हृदयात मानाचे स्थान पटकावणारी संस्था आहे. भगिरथाने ज्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर आणली, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याला, विशेषत: शेतकर्याना पाण्याची गंगा भूगर्भातून बाहेर काढून जलतृष्णा भागवणारी कंपनी लक्ष्मी हायड्रॉलिक्स आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे म्हणजे आजच्या युगातील भगिरथच होय!
सोलापूरचा औद्योगिक विकास – शरदकृष्ण ठाकरे
येती ५ वर्षे सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भारतातीलच नव्हे तर, परदेशातील उद्योजक सोलापुरात येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी येत्या ६ महिन्यांत मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. ज्यामुळे सोलापुरात येऊ इच्छिणार्या उद्योजकांसाठी आश्वासक वातावरण निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन शरदकृष्ण ठाकरे यांनी केले. मोठ्या उद्योगांची वाहतूक देखील मोठीच असते, त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण ६ महिन्यांत होणे नितांत गरजेचे आहे. बंद पडलेली हवाई वाहतूकसेवा सुरू केली जावी. तसेच शताब्दी एक्स्प्रेस ही रेल्वे पुन्हा सुरू होणे महत्त्वाचे ठरते. कारण शताब्दी एक्स्प्रेस जेव्हा सुरू होती, तेव्हा मोठमोठ्या कंपन्यांचे लोक सोलापूरला येऊ लागले होते, पण शताब्दी बंद झाल्याने या लोकांचा सोलापूरला येण्याचा ओघ थांबला आहे आणि हे सोलापूरच्या विकासाला खीळ बसणारे असल्याचे शरदकृष्ण ठाकरे यांनी अधोरेखित केले आहे. पायाभूत सुविधा हा औद्योगिक प्रगतीचा प्राण आहे! शहरात मूलभूत सोयी-सुविधां जसे की, शुद्ध पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, शिस्तबद्ध वाहतूक आदींची पूर्तता झाली तर, मॅनेजमेंट किंवा प्रथम दर्जाचा अधिकारीवर्ग ज्याला आपण ‘स्किल्ड मॅन पॉवर’ म्हणतो, तो वर्ग येणे सुरू होईल. त्यामुळे स्किल्ड मॅन पॉवरचा प्रश्न सुटेल, शिवाय यामुळे सोलापूरच्या उत्पादनांचा दर्जा व क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. सोलापूरच्या मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असल्याने आज हा वर्ग येथे येण्यास उत्सुक नाही. राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूरकर विकासापासून वर्षानुवर्षे वंचित राहिले आहेत. अनेक वर्षांपासून जकातीचा प्रश्न सतावत आहे. घेतलेल्या जकातीचा ९० टक्के परतावा देखील महापालिकेकडून मिळत नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात स्पर्धात्मक किमती ठेवण्यात जकातीचा मोठा अडसर असल्याचे सांगून शरदकृष्ण ठाकरे म्हणाले की, ‘जकात रद्द केली जावी म्हणून मी अनेक प्रयत्न केले आहेत. शासन, लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदने दिली, तरीही जकात हटलेली नाही. त्यामुळे भविष्याचा विचार करून एलएचपीचा प्रकल्प १४ डिसेंबर २००५ रोजी चिंचोळी एमआयडीसी येथे हलविणे भाग पडले, पण हे सर्वच उद्योजकांना करणे शक्य नाही, त्यामुळे सोलापूरच्या उद्योगवाढीला जकातीमुळे खीळ बसत असल्याने शासनकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा. सोलापूरचा कामगारवर्ग हा अतिशय पापभीरू असून, कार्यक्षम, संयमी आहे, पण सोलापूरच्या कामगारांबद्दल सतत चुकीचा प्रचार केला गेला आहे. वस्तुत: मालक किंवा व्यवस्थापनाच्या चुकांचे खापर कामगारवर्गावर फोडले गेले. सोलापुरात जर दर्जेदार वाहतूक व्यवस्था, रुंद रस्ते, स्वच्छ, मुबलक व किफायतशीर दरात पाणी आणि वीज पुरवली, तर सोलापूर हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून बिरूद मिरवेल, यात शंकाच नाही!.
उद्योगातील नवी पिढी : आदित्य शरदकृष्ण ठाकरे
‘जगतिक दर्जाच्या दृष्टीने फॅक्टरी ऍटोमेशन करणे अपरिहार्य आहे’, हे मत आहे शरदकृष्ण ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य शरदकृष्ण ठाकरे यांचे. आदित्य शरदकृष्ण ठाकरे हे उद्योगक्षेत्रात उतरलेले असून, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून एलएचपीच्या विकासाला वेग देण्यात गुंतलेले आहेत. त्यांनी ‘गिअरबेस्ड् मोटार्स, पीएमबीसी मोटार्सचे उत्पादन सुरू केलेले आहे. नव्या पिढीतील उद्योजक आदित्य म्हणतात की, माहिती -तंत्रज्ञानाच्या काळात दर्जेदार उत्पादनांबरोबरच व्यावसायिकताही महत्त्वाची आहे. उत्पादनक्षमता सुधारणे आणि पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. उत्पादनाचा दर्जा व क्षमता वाढविण्यासाठी नवनव्या सॉफ्टवेअर्सचा वापर ही काळाची गरज आहे. एलएचपीमध्ये ‘सॅप’ प्रोग्रामिंगचा वापर सुरू केल्याचे सांगून आदित्य म्हणाले की, यामुळे प्रॉडक्टीव्हिटी व दर्जा सुधारला व रिजेक्शन प्रमाण ०.४ टक्क्यांपेक्षाही कमी झाले.
…………………………………………………………………………………….
दै. तरुण भारत, सोलापूर. सोलापूरची उद्योग भरारी. रविवार, दि. २६ सप्टेंबर २०१०