Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » नीतिशकुमार के मुंगेरीलाल सपने!

नीतिशकुमार के मुंगेरीलाल सपने!

•चौफेर : अमर पुराणिक•

नीतिश कुमार यांचा संघ मुक्त भारतचा नारा म्हणजे ‘मुंगेलीलाल के हसिन सपने’ सारखा प्रकार आहे. संघासारख्या प्रखर राष्ट्रभक्त, निष्ठावान संघटनेला संपवणे केवळ अशक्य आहे. संघ हा काही राजकीय पक्ष नाही आणि नीतिश कुमारांसारख्या लोकांच्या राजकीय विधानांना उत्तरही देणार नाही. संघ आजपर्यंत केवळ आपले कार्य प्रामाणिकपणे आणि अखंडपणे करत आला आहे. संघाला कसलाच मोह नाही. संघ केवळ राष्ट्रभक्तीच्या मोहातच काम करतो. अशा निर्मोही आणि कर्मठ संघटनेला संपवणे म्हणजे नीतिश कुमारांना खेळ वाटला की काय? संघाला संपवता संपवता हजारो नीतिश कुमार संपतील पण संघाला धक्का देखील लावू शकणार नाहीत.

NITISH SANGHMUKT BHARATभाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्यापासून देशात द्विध्रुवीय राजकारण पहायला मिळत आहे. लोकसभेच्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यापासून विरोधी पक्षांत प्रचंड अस्वस्थता वाढली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी ज्या तर्‍हेची विकासाची घोडदौड सुरु केली आहे ती पाहता देशातील सर्वच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन बिहार लोकसभेच्यावेळी केले आणि ते त्यात यशस्वी झालेही. बिहारमध्ये मिळालेल्या विजयापासून नीतिश कुमार यांना पंतप्रधानपदाची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. खरेतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची आणि अफाट कार्यकर्तृत्वाची धडकी भरली आहे. त्यातूनच त्यांनी ‘संघ मुक्त भारत’ची अतातायी वल्गना केली. सर्व विरोधी पक्षांना भाजपाच्या विरोधात एकत्र येण्याचे विधान म्हणजे नीतिश कुमार यांचे राजकारण बुडत्याचे पाय खोलात असेच ठरणार आहे. भाजपा सारख्या एका पक्षाची येवढी धास्ती घेण्याचे कारण म्हणजे आपला राजनीतिक पाया वाचवण्याची, अस्तित्व टिकवण्याची नीतिश कुमार यांची धडपड सामान्य माणसालाही स्पष्ट दिसून येते.
सत्तेत आल्यापासून मोदींच्या कामाचा सपाटा पाहून नीतिश कुमारांना याची जाणिव झाली आहे की, यापुढे आपली आणि सर्वच विरोधी पक्षांची धडगत नाही. मोदींच्या नेतृत्वात वाढणारी देशाची ताकत ही खरी नीतिश कुमारांची पोटदूखी आहे. याच भीतीतून नीतिश कुमारांनी संघ मुक्त भारतची वल्गना केली. हिंदीमध्ये ‘ठंडा कर के खाना चाहिये’ अशी एक म्हण आहे. कदाचित नीतिशकुमार यांना बुजुर्गांनी सांगितलेल्या या म्हणीच्या मतीतार्थावर विश्‍वास नसावा. बिहारची निवडणुक जिंकल्यापासुन त्यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे. बिहारमध्ये सर्व विरोधकांना एकत्र करुन जिंकलेल्या निवडणुकीपासून त्यांना वाटतेय की त्यांना पंतप्रधानपदाचा फॉर्मुला मिळाला. पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा बाळगणे काही वाईट नाही. पण त्यांची महत्त्वाकाक्षा इतकी प्रबळ झाली आहे की, त्यांना महत्त्वाकांक्षा, वस्तूस्थिती आणि व्यवहारिकता यांचा समन्वय साधता नाही आला तर संपुर्ण कारकिर्दीचा बट्‌याबोळ होतो याची जाणिव राहिलेली नाही.
तसे नीतिश कुमार खूप अनुभवी राजकारणी आहेत त्यामुळेच त्यांच्या संघ मुक्त भारत या विधानाचे अश्‍चर्य वाटते. सर्व विरोधकांना एकत्र करण्यामागच्या त्यांच्या प्रयत्नामागे असे दिसून येते की, ज्या पद्धतीने कित्येक दशकं कॉंग्रेसने देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली होती, त्या स्थितीत आता भाजपा पोहोचला आहे. आता दोन-तीन दशकं तरी भाजपाच्याच हातात सत्ता राहणार या भीतीने नीतिश कुमारांना ग्रासले आहे. नीतिश कुमारांच्या विधानातून हे प्रतित होते की भाजपाला राष्ट्रीय स्थरावर आव्हान देण्याची आणि हरवण्याची क्षमता कॉंग्रेसमध्ये राहिली नाही आणि इतर विरोधकांतही नाही. कदाचित नीतिश कुमार हे मानून चालत आहेत की कॉंग्रेस राहुल गांधींना बाजूला सारुन सर्व विरोधकांच्या युतीचे नेतृत्वा त्यांच्याकडे सोपवेल. नीतिश कुमारांनी या गृहीतकावर विधान केले आहे की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात पंतप्रधान पदाचे ते उमेदवार आहेत. नेत्याची घोषणा त्यांनी केली आहे पण सर्व विरोधकांची एकजुट करणे आणि संगठन बांधणे ही जबाबदारी मात्र इतर सर्व विरोधकांची आहे असे त्यांना वाटते. अशी विधाने करताना नीतिश कुमार हे विसरत आहेत की प्रशांत किशोर यांची रणनीती सर्व ठिकाणी यशस्वी होणार नाही. ‘आडात नसेल तर पोहर्‍यात कोठून येणार’. केवळ रणनीतीवर सत्ता काबीज करता येत नसते त्यासाठी प्रबळ संघटन असावे लागते ते ही राष्ट्रीय स्थरावर. अन्यथा भाजपाला केरळ, पश्‍चिम बंगाल, तामिळनाडु, आंध्र प्रदेश सारख्या राज्यातही इतर राज्यांप्रमाणे सत्ता काबीज करता आली असती.
राजनीतिक व्यावहारितेचा विचार बिहारपासून सुरु केला तर नीतिश कुमारांचा जनता दल युनायटेड हा पक्ष केवळ बिहारमध्येच आहे. त्याचा जनाधार बिहार पुरताच सीमीत आहे. बिहारमध्ये सत्ता त्यांच्याकडे असली तरी ते नवीन पटनायक, मुलायम सिंह, जयललिता, ममता बॅनर्जींप्रमाणे स्वबळावर सत्तेत नाहीत किंवा एकट्‌याच्या ताकतीवर बिहारमध्ये सत्ता मिळवलेली नाही. लालूप्रसाद यादव यांच्या टेकूने ते मुख्यमंत्री झाले आहेत. या आधी भाजपाच्या पाठींब्यावर ते मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्या पक्षाला बिहारमधील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणायचे का हा ही प्रश्‍नच आहे.
भाजपा विरोधात सर्व पक्षांना एकत्र आणणे केवळ अशक्य गोष्ट आहे. कारण बहुतेक समाजवादी मंडळी कधीच एकत्र नांदू शकत नाहीत असा इतिहास आहे. शिवाय उत्तर प्रदेशात बसपा आणि सपा, बंगालमध्ये तृणमूल आणि माकपा, ओरिसातील बीजू जनता दल, तामिळनाडूत अण्णाद्रमुक आणि द्रमुक, हरयाणात कॉंग्रेस आणि लोकदल, केरळमध्ये कॉंग्रेस आणि डावे यांना नीतिश कुमार कसे  एकत्र आणणार आहेत? या ही पेक्षा महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की, या सर्व राज्यातील या पक्षांना नीतिश कुमार यांचा मत मिळवण्यासाठी किती उपयोग होणार आहे? यापैकी कोणत्याही राज्यात जदयुचा मांगमूसही नसताना हे सर्व त्या त्या राज्यातील बलवान पक्ष नीतिश कुमारांची पालखी कशासाठी उचलतील? नीतिश कुमारांच्या या आवाहनाला कोणाचाही गंभीर प्रतिसाद मिळालेला नाही. कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे पण ती खोचक आहे. कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष पक्षांच्या युतीला तयार आहे असे म्हणतानाच कॉंग्रेस खुप आधीपासून भाजपा व संघाच्या विरोधात आहे असा खूलासाही केला आहे. जास्त काही न बोलताच दिग्विजय सिंह यांनी नीतिश कुमार यांच्या भूमिकेवर कुरघोडी केली आहे. नीतिश कुमार १७ वर्षे भाजपाच्याच संगतीत होते याकडे त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा केला आहे. दूसरी प्रतिक्रिया लालूंची आहे. ते म्हणतात की बिहारचा कोणी जर पंतप्रधान होणार असेल तर लालू त्यास पाठिंबा देतील. लालूंचे हे विधान नेहमीप्रमाणे राजकीय चतुराईचेच आहे. त्यांनी नीतिश कुमार यांच्या आवाहनाचे समर्थनही केले नाही किंवा विरोध ही दर्शवला नाही.
जनता दल परिवार एकत्र करण्याचे प्रयत्न आजपर्यंत अनेकदा झाले आहेत त्याचा इतिहास पाहणे आवश्यक आहे. १९७७, १९८९, १९९८, १९९९ मध्ये केंद्रात बिगर कॉंग्रेसी सरकार सत्तेत आले. १९९९ चे अटलजींच्या नेतृत्वातील रालोआ सरकार वगळता बाकी सर्व सरकारं ही जनता परिवाराचीच राहिली आहे. जनता दलाला चांगला जनाधार मिळूनही जनता दलाला आपला कार्यकाळही पुर्ण करता आलेला नाही, विकास तर लांबच राहिला. आजपर्यंत राष्ट्रीय पक्षच केंद्रात सत्तेत आले आहेत. भाजपा सुद्धा राष्ट्रीय स्थरावर मजबूत झाल्यानंतरच सत्तेत आला आहे. कॉंग्रेसच आजपर्यंत राष्ट्रीय स्थरावर बळकट होती. पण आता कॉंग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. शिवाय एकामागून एक अनेक राज्यातही सत्ता गमवून बसली आहे. भाजपा मात्र हळुहळु सर्वच राज्यात पसरत चालली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजपा आणखीनच बळकट झालेली असेल. याच भीतीने नीतिश कुमारांना ग्रासले आहे.
राजकीय युती ही परस्पर पूरक आणि फायद्याची असेल तरच होत असते. नीतिश कुमारांना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा आहे याचा अर्थ नीतिश कुमार असे मानून चालले आहेत की मुलायम सिंह, मायावती, ममता, जयललिता, नविन पटनायक यांना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा नाही आणि ते आपल्या महत्त्वाकांक्षेचे दमन करुन नीतिश कुमारांचे नेतृत्व मान्य करतील? राहुल गांधी तर खूप आधीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत त्यांचं काय? शिवाय राष्ट्रीय भूमिकेत यायच स्वप्न उराशी बाळगून एकदा दिल्लीची सत्ता हातची घालवणारे अरविंद केजरीवाल नीतिश कुमारांच नेतृत्व मान्य कसं कसतील? नीतिश कुमार यांना मोदी, भाजपा आणि संघाशी भिडण्याआधी आपल्या संभावित साथीदारांशी भिडावे लागेल आणि ते इतके सोपे नाही. यासर्वाहुन महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे की नीतिश कुमारांमध्ये या सवार्र्ंचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे का? नाही असेच याचे उत्तर कोणीही देईल.
नीतिश कुमार यांचा संघ मुक्त भारतचा नारा म्हणजे ‘मुंगेलीलाल के हसिन सपने’ सारखा प्रकार आहे. संघासारख्या प्रखर राष्ट्रभक्त, निष्ठावान संघटनेला संपवणे केवळ अशक्य आहे. संघ हा काही राजकीय पक्ष नाही आणि नीतिश कुमारांसारख्या लोकांच्या राजकीय विधानांना उत्तरही देणार नाही. संघ आजपर्यंत केवळ आपले कार्य प्रामाणिकपणे आणि अखंडपणे करत आला आहे. संघाला कसलाच मोह नाही. संघ केवळ राष्ट्रभक्तीच्या मोहातच काम करतो. अशा निर्मोही आणि कर्मठ संघटनेला संपवणे म्हणजे नीतिश कुमारांना खेळ वाटला की काय? संघाला संपवता संपवता हजारो नीतिश कुमार संपतील पण संघाला धक्का देखील लावू शकणार नाहीत.

Posted by : | on : 24 Apr 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *