Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक » पश्‍चिम बंगालमधला युती-प्रतियुतीचा खेळ

पश्‍चिम बंगालमधला युती-प्रतियुतीचा खेळ

•चौफेर : अमर पुराणिक•

युती-प्रतियुतीच्या राजकारणात जनता काय मागते याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कोणाची युती कोणाशी होते यापेक्षा जनतेचा कल कोणत्याबाजूने आहे यावर सर्वांचे यशापयश अवलंबून आहे. गठबंधन, महागठबंधन करुन काय होते ते पश्‍चिम बंगालची जनता बिहारमध्ये पहात आहे. तेथे नीतिश कुमार आणि लालू यांच्या नेतृत्वा जंगलराज सुरु झाले आहे. पश्‍चिम बंगालची जनता पश्‍चिम बंगालमध्ये जंगलराज इच्छिनार नाहीच त्यामुळे शेवटी जनताच जनार्दन आहे. जनता जे इच्छिल तेच होईल.

West_Bengal_Election_2016पश्‍चिम बंगालमध्ये तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. हिंसा, दंगलींच्या अस्थिर वातावरणामुळे पुर्ण पश्‍चिम बंगाल राज्य ढवळुन निघाले आहे. अशा स्थितीत होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी युती आणि प्रतियुतीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तृणमूल कॉंग्रेस, माकपा, कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यात लढती होणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत एकट्‌याने निवडणुक जिंकण्याची क्षमता असणारा पक्षही म्हणू शकत नाही की बंगालमध्ये आम्ही निवडुन येणार! आजपर्यंत डावे आणि तृणमुल कॉंग्रेसनेच बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. पण आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे युती आणि प्रतियुतीचे खेळ सुरु आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतु चंद्र कुमार बोस यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्याई सर्व देशालाच लाभली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना ती नाही लाभली तर नवल. पश्‍चिम बंगलामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पक्ष फॉरवर्ड ब्लॉक स्वातंत्रपुर्व काळापासून कार्यरत होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या विरोधामुळे आणि नेताजी सुभाषचंद्रद्वेषामुळे सतत बोस कुटुंबीय आणि फॉरवर्ड ब्लॉक पक्ष दबला गेला किंवा दाबला गेला. त्यामुळे फॉरवर्ड ब्लॉक पक्ष कमकुवत स्थितीत राहिला. त्याचाच फायदा घेत बंगालमध्ये डाव्यांनी आपले बस्तान बसवले. नुकताच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत चंद्र कुमार बोस यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अनेक समिकरणे बदलली आहेत. इतकी वर्षे भाजपा तेथे नावापुरतीच होती, भाजपाचे अस्तित्व अतिशय नगण्य होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून भाजपाने तेथे जोरदार कार्य सुरु केल्यामुळे हळुहळु भाजपा तेथे मुरतेय. या विधानसभा निवडणुकीत भाजपा चांगले यश मिळवेल पण सत्तासोपान चढण्याची शक्यता नाही. तेथे खरी लढत आहे ती तृणमूल कॉंग्रेस आणि माकपा यांच्यात आहे. पण पश्‍चिम बंगाल मधील भाजपाच्या उदयामुळे तिसरा प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे.
सध्या कॉंग्रेस माकपाशी युती करण्याचा प्रयत्न करत आहेत, तशी शक्यता पडताळुण पाहण्याचे काम सुरु आहे. तसेच सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसशी युती करण्याचीही शक्यता आहे. तसेही प्रयत्न सुरु आहेत. कॉंग्रेसने माकपासोबत युती करु नये म्हणून तृणमूल प्रयत्नशील आहे. त्यासाठी आपले ताळमेळ जमवण्याच्यादृष्टीने कॉंग्रेसशी सलगी सुरु आहे. त्याचे कारण तृणमूल कॉंग्रेस ही भाजपाची कट्टर विरोधक आहे. तशी पार्श्‍वभूमीही तृणमूल कॉंग्रेसला आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या संसदीय शिष्टमंडळाला मालदा येथे जाण्यापासून हे सांगून रोखले की तेथे हिंदू-मुस्लिम दंगे झाल्यामुळे तेथे आणखीन तणाव निर्माण होईल. भाजपाने या हिंदू-मुस्लिम दंगली तृणमूल आणि डाव्यांमुळेच पेटल्या असल्याचा आरोप केला होता. मुस्लिम लांगुलचालन करुन बांगलादेशी घुसखोरांना हाताशी धरुन राजकारण करणार्‍या तृणमूल, डावे आणि कॉंग्रेस यांनी सतत भाजपावर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तृणमूल कॉँग्रेस आज भाजपाला जातीयवादी म्हणताना थकत नाही. पण तृणमूल हे विसरतेय की जेव्हा अटलजींच्या काळात भाजपाप्रणित रालोआ सरकारात तृणमूल कॉंग्रेस होती, तेव्हा भाजपा जातीयवादी नव्हती का?
तृणमूल कॉंग्रेसने पश्‍चिम बंगालमध्ये १९९८ च्या निवडणुकीत भाजपासोबत युती केली होती आणि तेव्हा भाजपाने पश्‍चिम बंगालमधून दोन खासदार निवडुन आणले होते. सध्या मात्र तृणमुल कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसशी जवळीक करत आहे. कॉंग्रेसच्याही वरिष्ठ नेत्यांना वाटते की दिल्लीत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी तृणमूल कॉंग्रेस लाभदायक ठरेल. पश्‍चिम बंगालमधूल तृणमूल कॉंग्रेसचे ३४ खासदार आहेत तर कॉंग्रेसचे केवळ चार आहेत. याला खूप दिवस झालेले नाहीत की जेव्हा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना संसदेत तृणमूल कॉंग्रेसचा पाठींबा लागला तेव्हा ममतादीदींनी तो निसंकोच दिला होता. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशिवाय राहुल गांधीसोबतही ममतादीदींचे संबंध चांगले आहेत. कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस यांनी या आधीही युती करून निवडणुका लढवल्या आहेत, आणि तितक्याच सहजतेने युती तोडून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले आहेत. कॉंग्रेसमधून फुटूनच तृणमूल कॉंग्रेस निर्माण झाला आहे त्यामुळे दोन्ही पक्षात बरीच समानता आहे. कॉंग्रेस आणि तृणमूल या दोघांनाही माहीत आहे की युती केली तर दोघांचाही फायदा आहे. कॉंग्रेस पक्ष तृणमूलशी युती करून पश्‍चिम बंगालमध्ये आपली शक्ती वाढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि तृणमूलची युती होण्याची शक्यता अधिक आहे. दूसर्‍या बाजूला ममता बॅनर्जींना आपल्या स्वतंत्र ताकदीचा स्वत:वर भरवसा आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसशी युती करण्याची गरज नाही. पण पश्‍चिम बंगालमध्ये भाजपा बळकट होत असल्याने ममतादीदी कॉंग्रेसचा पर्याय स्विकारतील. नीतिश कुमार यांनीही पश्‍चिम बंगालमध्ये महागठबंधन करण्याचे बोलून दाखवले आहे पण त्यांचे पश्‍चिम बंगालमध्ये अस्तित्व शुन्य आहे. जर पश्‍चिम बंगालमध्ये भाजपा सशक्त असती तर मात्र तृणमूल कॉंग्रेस, डावे, कॉंग्रेस आदी सर्वजण मिळून बिहारप्रमाणे महागठबंधन स्थापून निवडणुका लढवल्या असत्या. भाजपाने मालदा, वीरभूम आणि कोलकाता येथील दंगलीनंतर आपली सक्रियता खूप मोठ्‌याप्रमाणात वाढवली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते नितिन गडकरी यांची तेथे अभूतपुर्व मोठी सभा झाली होती. त्यांच्या सभेला खूप जोरदार प्रतिसाद मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याही सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भाजपाचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. ममता बॅनर्जी यांनी आणि त्यांच्या आधी डाव्यांनीही मुस्लिम लांगुलचालन करत मुस्लिमांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे पश्‍चिम बंगाल भाजपाने ममतांच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चंद्र कुमार बोस यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाला त्याचा मोठ फायदा होणे अपेक्षित आहे.
दूसर्‍याबाजूला डाव्यांचाही कॉंग्रेसशी युती करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, पश्‍चिम बंगाल माकपा सचिव सुर्यकांत मीश्र आणि माकपाचे राष्ट्रीय महासचिव सीताराम येचुरी यांचे तसे प्रयत्न सुरु आहेत. माकपाने कॉंग्रेसशी युती करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे तृणमूलही सावध आहे. माकपा एकटयाच्या जीवावर पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेत येऊ शकत नाही त्यामुळे माकपा युतीसाठी प्रयत्नशील आहे. एकबाजूला कॉंग्रेसने ममता बॅनर्जी यांना सत्तेतून हटवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. तर दुसर्‍याबाजूला डाव्यांनीही ममतांना हटवण्याचे उघड प्रयत्न केले आहेत. कॉंग्रेस आणि तृणमूल यांच्यामधून विस्तव जात नाही तसेच कॉंग्रेस आणि माकपा यांच्यातही वीळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. तर तिसर्‍या बाजूला कॉंग्रेसचे पश्‍चिम बंगालमधील अस्तित्व नगण्यच आहे. त्यामुळे तृणमूलला आणि डाव्यांना कॉंग्रेसचा फायदा होणार नाही जर झाला तर तो भाजपाला विरोध करण्यापूरताच.
या सगळ्या युती-प्रतियुतीच्या राजकारणात जनता काय मागते याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. कोणाची युती कोणाशी होते यापेक्षा जनतेचा कल कोणत्याबाजूने आहे यावर सर्वांचे यशापयश अवलंबून आहे. गठबंधन, महागठबंधन करुन काय होते ते पश्‍चिम बंगालची जनता बिहारमध्ये पहात आहे. तेथे नीतिश कुमार आणि लालू यांच्या नेतृत्वा जंगलराज सुरु झाले आहे. पश्‍चिम बंगालची जनता पश्‍चिम बंगालमध्ये जंगलराज इच्छिनार नाहीच त्यामुळे शेवटी जनताच जनार्दन आहे. जनता जे इच्छिल तेच होईल.

Posted by : | on : 14 Feb 2016
Filed under : Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *