Home » Blog » शेपूट घालणारे आणि शेपूट पिरगाळणारे

शेपूट घालणारे आणि शेपूट पिरगाळणारे

 पंचनामा : भाऊ तोरसेकर
बिचारे पत्रकार नि:शस्त्र असतात. त्यांच्या हातात कुठले प्राणघातक शस्त्र नाही. मग ते घाबरले तर काय मोठे? तेव्हा पत्रकारांचा विषय बाजूला ठेवूया. ज्यांनी तुमचे आमचे अशा दंगेखोरांकडून संरक्षण करायचे आहे, ते पोलिस तरी किती सज्ज आहेत व किती हिंमतबाज आहेत? पंचवन्न जखमीमध्ये पंचेचाळिस पोलिसच होते. यातून पोलिसांच्या हिंमतीची साक्ष आपल्याला मिळालेली आहेच. पण दंगल शमल्यानंतर तरी गुन्हेगारांना शोधून न्यायासनासमोर हजर करण्याची हिंमत पोलिसात आहे का? आपण याचा विचार करायलाच हवा. कारण आपण कायदा आहे, कायद्याचे राज्य आहे, पोलिस कायदा राबवत आहेत, अशा भरवशावर जगत असतो. ते खरेच कायदाव्यवस्था ठेवू शकतात की नाही; हे कोणी बघायचे? तेव्हा शनिवारी जी दंगल झाली त्यावेळचे पोलिसांचे काम आणि नंतरची कारवाई, याची म्हणूनच झाडाझडती घ्यावीच लागेल. त्याबाबतीत एक बातमी इथे जशीच्या तशी वाचकाच्या नजरेस आणून देणे मला आवश्यक वाटते. शनिवारी घटना घडली आणि मंगळवारी 14 ऑगस्ट 2012 रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे. तिच्या शिर्षकासह ती काळजीपुर्वक वाचायला हवी.
पोलिसांना भीती तणावाची

   रझा अकादमीने शनिवारी काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या दोघांवर रविवारी कुर्ला – कसाईवाडा आणि वांद्रे – भारतनगर येथे अंत्यसंस्कार झाले. या भागात तणावपूर्ण शांतता असून अशा स्थितीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन दंगलखोरांची धरपकड सुरू केली तर वातावरण चिघळेल , अशी भीती पोलिसांना वाटत आहे . येत्या काही दिवसांत स्वातंत्र्यदिन व रमझान ईद हे सण येत आहेत. अशा वेळी परिस्थिती बिघडल्यास दहशतवादी संघटना त्याचा फायदा घेऊन घातपात घडवतील, अशी भीती आहे. त्यामुळे काही दिवस थांबून मग कारवाई करणार असल्याचे कळते. यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सोमवारी बैठकही घेतली . 

माहिती गोळा करण्याचे काम 
   येत्या 20 ऑगस्टपर्यंत चंद्रदर्शन झाल्यानंतर रमझानचे उपवास पूर्ण होतील. तोपर्यंत पोलिस हातावर हात धरून न बसता माहिती गोळा करण्याचे काम करणार आहेत. काही संवेदनशील भागांत पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आहे. 

महिला पोलिसांमध्ये संताप 
    दंगलीच्या काळात पाच महिला कॉन्सटेबलचा विनयभंग झाल्यामुळे महिला पोलिसांमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. मुंबईत अनेकदा दंगलसदृश स्थिती निर्माण झाली, परंतु महिला पोलिसांना हात लावण्याची हिंमत आजवर कोणालाही झाली नव्हती. परंतु शनिवारी घडलेल्या प्रकारामुळे महिला पोलिसांमध्ये प्रचंड संताप आहे.

   बातमीचे शिर्षकच बोलके आहे ना? पोलिसांना भिती? हे काय प्रकरण आहे? पोलिस कशाला घाबरलेले आहेत? कोणाला घाबरलेले आहेत? जो स्वत:च घाबरलेला आहे, तो अन्य कोणाला संरक्षण देऊ शकतो का? कायदा राबवणारा असतो त्याने कोणाला व कशाला घाबरून चालेल काय? तो घाबरलेला असेल तर तो निर्धास्तपणे कायद्याचा अंमल करू शकेल काय? आणि पोलिस कोणत्या कारणासाठी घाबरले आहेत? ते गुन्हा करणार आहेत, की गुन्हेगारांना शोधणार व पकडणार आहेत? गुन्हेगारांना पकडण्यासाठी घाबरायचे कारण काय? गुन्हेगारांना शोधण्याचे भय कशाला? इकडे त्यांचे बॉस गृहमंत्री आबा पाटिल तर आपण शेपूट घालणारे नाहीत म्हणून वाहिन्यांवर गर्जना करतात. तेवढेच नाही तर आपण शेपूट पिरगाळणारे आहोत असा हवालासुद्धा देतात. मग पोलिस कशाला घाबरले आहेत? शेपूट घालणे म्हणजे काय असते? ती हिंमतीची खुण असते, की भेदरल्याची निशाणी असते? शेपूट घालणे वा पिरगाळणे याचे नेमके अर्थ तरी आबांना ठाऊक आहेत काय? असतील तर त्यांनी अशी भाषा वापरली नसती, किंवा अशी बातमी तरी वृत्तपत्रातून आली नसती. पण तशी आतमी आलेली आहे आणि अगदी कुठल्या चिरकुट नव्हेतर एका मान्यवर दैनिकात झळकलेली ती बातमी आहे. मग लोकांनी कशावर विश्वास ठेवायचा? पोलिसांनी शेपूट घातल्याच्या या बातमीवर की शेपूट पिरगाळण्याच्या आबांच्या वल्गनेवर? की पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आणि आबा यांना एकमेकांच्या भाषा कळतच नाहीत? आबा बातम्या तरी वाचतात काय? ही बातमी काय सांगते?

    “तणावपूर्ण शांतता असून अशा स्थितीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन हाती घेऊन दंगलखोरांची धरपकड सुरू केली तर वातावरण चिघळेल, अशी भीती पोलिसांना वाटत आहे”. वातावरण चिघळेल म्हणून धरपकड करायची नाही? तणावपुर्ण शांतता आहे म्हणजे काय? कशासाठी तणाव आहे? ज्या वस्त्यांमध्ये तणाव आहे, त्यांच्यावर अन्याय झाला आहे, की तिथल्या काही संशयितांनी गुन्हा केलेला आहे? या बातमीचा सरळसरळ अर्थ इतकाच लागतो, की दंगलखोरी केली, त्यांना हात लावल्यास त्यांचे शेजारीपाजारी रस्त्यावर येतील. म्हणजेच ज्यांनी संशयास्पद उद्योग केला आहे, दंगा के्ला आहे, त्यांना त्यांचे शेजारी संरक्षण द्यायला रस्त्यावर येण्याचा धोका आहे. त्या धोक्याला घाबरून पोलिस त्यांना लगेच हात लावायला धजावत नाहीत. याला शेपूट कुठे असणे म्हणतात आबा? शेपुट पिरगाळली तर वातावरण चिघळेल; असाच त्या बातमीचा अर्थ होत नाही काय? अर्थात असे कुणा पोलिस अधिकार्‍याने अधिकृतरित्या सांगितलेले नाही. पण ती बातमी पोलिस सुत्रांकडून आली असणार यात शंकाच नाही. पण ती बातमी लोकांमध्ये कुठला संदेश घेऊन जाते आहे? पोलिस घाबरल्याचा किंवा पोलिसांनी दंगेखोरांसमोर शेपूट घातल्याचा्च तो संदेश नाही काय? आणि जो गृहमंत्री असतो त्याच्या पोलिसांनाच त्याचे शेपूट म्हणतात; हे मी आबांना वेगळे समजावून सांगण्याची गरज आहे काय?

   गृहमंत्री आबा पाटिल आणि पोलिसांना एवाढेच सांगण्याची गरज आहे, की कुत्र्याचे शेपूट कुठे आहे ते लोक त्याल विचारत नाहीत. कारण ते कुठे आहे ते लोकांना दिसत असते. तेव्हा आबा वाहिन्यांवर काय फ़ुशारक्या मारतात त्याला अर्थ नाही. लोक वास्तवात काय अनुभव घेत आहेत, त्याला महत्व आहे. तिथे पोलिस जखमी झालेले, पोलिस घाबरलेले आणि सरकारही भेदरलेले दिसत आहे. तेव्हा त्या सरकारने किंवा गृहमंत्र्याने आपण शेपूट पिरगाळतो; अशा फ़ुकाच्या गमजा करण्याचे कारण नाही. त्यांनी शेपूट पिरगाळली हे दिसायला हवे. इथे तर उलटे दिसते आहे. अर्ध्या तासाच्या सुनियोजित दंगलीने व हिंसाचारातून रझा आकादमीनेच पोलिसांचे शेपूट पिरगाळले आहे, असे दिसते आहे. पोलिसच भेदरले आहेत असा बातम्या येत आहेत आणि त्याचा इन्कारही गृहमंत्री करू शकलेले नाहीत. मी तर पुढे जाऊन केंद्रीय गृहमंत्र्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो. सुशिलकुमार शिंदे यांनी अफ़वा पसरवतील, त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. तो खरा असेल तर त्यांनी महाराष्ट्र टाईम्समधल्या या बातमीची गंभीर दखल घ्यायला हवी आहे. ती बातमी मुंबईकरांना भयभीत करणारी आहे. जे पोलिस गुंड, गुन्हेगार, दंगलखोरांना पकडायला घाबरतात, ते जनतेचे संरक्षण करू शकत नाहीत; अशी समजूत या बातमीतून निर्माण होऊ शकते. म्हणूनच ती बातमी खरी आहे की ती अफ़वा आहे; त्याची शहानिशा सरकारकडून व्हायला हवी आहे. पण सरकार तशी कुठलीही कारवाई करू शकलेले नाही. म्हणूनच त्या बातमीवर विश्वास ठेवावा लागतो. आणि त्या बातमीवर विश्वास ठेवायचा, तर आजच्या सरकारच्या भरवश्यावर आपण सुरक्षित जीवन जगण्याची हमी उरलेली नाही, हेच निखळ सत्य आपल्या हाताशी शिल्लक उरते.

   आणि त्यात आता काहीही नवे उरलेले नाही. प्रत्येक हिंसक स्फ़ोटाची वा जिहादी घातपाताची घटना घडली, मग सरकार व पोलिस निकामी व निरुपयोगी ठरल्याचाच आपला अनुभव आहे. मग तो कसाब त्याची टोळी घेऊन मुंबईत आला व त्याने सरसकट लोकांची कत्तल करण्याचा प्रसंग असो की रझा अकादमीने मेळावा भरवून पोलिसांना जखमी करण्याचा प्रसंग असो. सामान्य लोकांचे सोडून द्या. पोलिस आपले स्वत:चे संरक्षण करण्याइतके तरी शुरवीर पराक्रमी राहिलेत काय, असा प्रश्न आता आहे. कारण कसाबने तीन मोठे अधिकारी मारले आणि परवाच्या दंगलीत 45 पोलिस जखमी करण्यापासून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत मजल गेली आहे. आणि मटाची बातमी म्हणते दंगेखोर रझा अकादमीच्या पाठिराख्यांचा शोध घ्यायची पोलिसांना भिती वाटते आहे. पत्रकार घाबरलेत, पोलिस घाबरलेत, सत्ताधारीही मते घटतील म्हणून घाबरले आहे. अशा भेदरलेल्यांच्या भरवश्या्वर आपण सुरक्षित कसे जगणार आहोत? आणि जगण्याची गोष्ट नंतरची आपण जिवंत राहू याची तरी हमी कोणी द्यायची?  १८/८/१२

Posted by : | on : 20 Aug 2012
Filed under : Blog
Author Description : I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper..
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *